महापालिकेच्या इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विपश्यनेचे वर्ग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 February 2016

महापालिकेच्या इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विपश्यनेचे वर्ग

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धीक वाढीकरीता सहाय्यकारी ठरणारे आनापान साधना वर्ग (विपश्यना) महापालिका शाळेत सुरु करण्यात आले आहेत. या आनापान साधना वर्गामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना एकाग्रता साध्य करण्याच्या दृष्टीने मदत होणार असून हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतून विद्यार्थ्यांसाठी आनापान साधना वर्ग सुरु करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. आनापान साधना वर्गास ‘मित्र उपक्रम’ (Mind in Training for Right Awareness) या नावाने संबोधण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा मानसिक व बौद्धीक वाढीकरीता प्रभावी बदल व वाढ घडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात व स्पर्धेच्या युगात शालेय मुलांची मानसिकता व एकाग्रता स्थिर होण्यासाठी आनापान साधना वर्ग महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले. त्या आज (दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१६) कुलाबा मराठी शाळा येथे आयोजित आनापान साधना वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. उप शिक्षणाधिकारी डॉ. जीवबा केळुसकर, मुख्याध्यापक  एस. एस. मगर हे मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. दराडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करताना त्यांचे मन आणि चित्त एकाग्र राहणे गरजेचे आहे. आनापान साधना वर्गातून मन आणि चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न आहे. त्यासोबत इतरांशी कसे सौजन्याने वागावे, हेही यातून शिकविण्यात येते. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यापुढे दरदिवशी शाळा सुरु होण्यापूर्वी आणि शाळा सुटण्यापूर्वी १० मिनिटे हा वर्ग घेण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad