मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही महिने उरले असताना शिवसेना-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत़ रस्ते घोटाळा, टँकरमाफिया अशा अनेक विषयांमध्ये उभय पक्षांनी परस्परांना लक्ष्य केले आहे़ एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खचणार नाही, असे शिवसेनेने ठणकावले़, तर दुसरीकडे हे आव्हान स्वीकारून भाजपाने ही तर नुसती सुरुवात आहे, असा इशारा मित्रपक्षाला दिला आहे़ त्यामुळे निवडणुकीपूर्वीच युतीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे़ सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पाणीगळती, टँकरमाफिया या मुद्द्यांवर भाजपाने शिवसेनेला धारेवर धरले आहे.
स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने राज्यात सत्तेवर असलेल्या आपल्या सरकारचा पुरेपूर फायदा उठवत प्रत्येक कामाचे के्रडिट घेण्यास सुरुवात केली आहे़ बेस्ट उपक्रमाच्या कमी अंतराच्या प्रवासी भाड्यामध्ये घट करण्याचा निर्णय घेऊन भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केली.त्यानंतर अशा धक्क्यांची मालिका सुरूच ठेवत भाजपाने शिवसेनेच्या नाकी नऊ आणले आहेत.त्यामुळे शिवसेनेनेही मित्रपक्षावर हल्लाबोल केला आहे़
पालिकेच्या पाण्याची विक्री करून टँकरमाफिया गबर झाल्याचा आरोप भाजपाने बुधवारी केला़ त्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजय मेहता यांची गुरुवारी भेट घेऊन टँकरमाफियांवर कारवाईची मागणी केली़ मुंबईत दररोज वाया जाणाऱ्या २७ टक्के बेहिशोबी पाण्यामध्ये १२ ते १५ टक्के टँकरमाफियांच्या घशात जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे़


No comments:
Post a Comment