वडाळ्यातील नाल्यांच्या सफाई मोहिमेचे तीनतेरा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वडाळ्यातील नाल्यांच्या सफाई मोहिमेचे तीनतेरा

Share This
मुंबई / मुकेश धावडे 
नालेसफाईकडे लक्ष द्यायला पालिका अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील नाल्यांच्या सफाई मोहिमेचे तीनतेरा वाजले असून, वडाळा-पूर्वेतील कोरबा मिठागरामधील एकाही नाल्याची पूर्णपणे सफाई झालेली नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

पावसाळ्यापूर्वी पालिका दर वर्षी नालेसफाईची मोहीम हाती घेते. यंदाही आरोग्य विभागातर्फे अशी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, दर वर्षीप्रमाणे मे महिना संपत आला तरी अनेक नाल्यांतून कचरा वाहत असल्याचे चित्र आहे. वडाळ्यातील अनेक नाले आणि गटारे कचरा वा प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबली असून, रस्त्यावरही घाणीचे ढीग साचले आहेत. कोरबा मिठागर परिसरात रमामाता वाडी, नाना भाईवाडी, काळेवाडी, लक्ष्मणवाडी, नानूरवाडी व आदर्श रमाई नगर नाला असे एकूण सात नाले आहेत. वडाळ्यात कोकरी आगार नाला व संगमनगर नाला आहे. आदर्श रमाईनगर नाला व लालबहादूर शास्त्री नगर नाला हे मोठे असून, ते अद्याप कचऱ्याने भरलेले आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच उरलेली नाही.

आदर्श रमाई नगर नाल्याच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने नाल्याची साफसफाई केली तरी कचरा उचलण्यासाठी घनकचरा विभागाचे कर्मचारी येत नसल्याने तो पुन्हा नाल्यातच जातो. मग साफसफाईचा काय उपयोग, असा सवाल स्थानिक नागरिक सुमन भोंगळे यांनी केला. आदर्श रमाई नगर नाल्याच्या स्वच्छतेकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. नाल्यालगत असलेल्या गणेश नगर, हिंमत नगर, आदर्श रमाई नगर, सिद्धार्थ नगर, लालबहादूर शास्त्री नगर, शिवशक्ती नगर, बरकत अली रोड आदी भागांतील मिळून जवळपास 25 हजारांहून अधिक झोपडीधारकांना पावसाळ्यात धोका आहे.

नाल्यात बसून आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा 

नाल्यात काही ठिकाणी कचरा तुंबल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. जवळच खाडीचा भाग असल्यामुळे पावसाच्या साचणाऱ्या पाण्यातून विषारी साप घरात येण्याची भीती रहिवाशांना भेडसावत आहे. कोरबा मिठागरामधील सर्व नाल्यांची आणि परिसरात ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी वडाळा प्रभाग 172 चे मनसे शाखा प्रमुख संजय रणदिवे यांनी केली आहे. नालेसफाईस वेग आला नाही तर नाल्यात बसून आंदोलन करू, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला आहे.

पालिकेच्या वतीने नालेसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आलेले आहे. त्यानुसार वस्तीपातळीवर नालेसफाई करण्यात येत आहेत. नालेसफाईसाठी 31 मे अंतिम तारीख असली तरी त्यासाठी 5 जूनपर्यंतचा वेळ लागेल.
- लक्ष्मण व्हटकर (प्रभारी पालिका मुख्य अभियंता, पर्जन्य जलवाहिनी)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages