मुंबई, दि. ७ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भविष्यात अपघात होणार नाहीत, याकडे अधिक लक्ष देऊन सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वेगाने वाहन चालवणारे,वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करा. वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे २४ तास वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. भविष्यात अधिक सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने नियोजन करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सादरीकरण केले. आढावा बैठकीला वाहतूक शाखा, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.