नाशिक घटनेनंतर दलित समाजाची न्यायालयात धाव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाशिक घटनेनंतर दलित समाजाची न्यायालयात धाव

Share This
मुंबई : दलित मुलाने मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले; तर दुसरीकडे दलितांवर मराठा समाजाकडून अत्याचार करण्यात येत असल्याने व त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातल्याने दलित वर्गातील दोघांनी थेट उच्च न्यायालयाची पायरी गाठली आहे.
त्र्यंबेकश्वर येथे ९ आॅक्टोबर रोजी एका पाच वर्षीय मराठा मुलीवर दलित मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली त्याच दिवशी ५० जणांच्या जमावाने सांजेगाव येथील दलितांच्या १५ घरांवर हल्ला केला. जो सापडेल त्याला मारहाण केली तर महिलांचा विनयभंग केला, असा आरोप नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील सांजेगावची रहिवासी बेबीबाई शिंदे (५०) आणि साहेबराव पवार (३०) यांनी याचिकेद्वारे केला आहे. या हल्ल्यात बेबीबाई यांची मुले शिवाजी आणि विजय गंभीररीत्या जखमी झाले. दोघेही कोमामध्ये असून, शिवाजीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर विजय नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. या जमावाने सांजेगाव येथील बौद्धविहाराचीही तोडफोड केली. या घटनेची पोलिसांनी अद्याप दखल घेतलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

‘त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर अनुसूचित जाती व जमातीच्या समाजावर पूर्णपणे सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करून दिला जात नाही तसेच पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. मुलांनाही शाळा सोडून घरी बसावे लागत आहे,’ असे याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ‘पोलिसांकडून साहाय्य मिळावे यासाठी बेबीबाई शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकार महिलेचा फोन वापरून महासंचालक सतीश माथूर यांना फोन केला. मात्र माथूर यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्या वेळी कार्यालय बंद असल्याचे कारण पुढे केले. त्यावर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागू, असे माथूर यांना सांगितले. माथूर यांनी त्यांना उच्च न्यायालयात भेटू, असे सांगितले,’ असेही अ‍ॅड. सदावर्ते यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांना याबाबतीत सूचना घेण्याचे निर्देश दिले.

दंगलखोरांविरुद्ध २३ गुन्हे
तळेगाव येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटलेल्या पडसादातून समाजकंटकांनी ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हजारो दंगलखोरांविरुद्ध २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सध्या सर्वत्र शांतता असली तरी समाजकंटकांची धरपकड सुरू झाली आहे.

तळेगाव येथील बालिकेवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर रात्रीच संतप्त जमावाने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव फाट्यावर जमून रास्ता रोको आंदोलन तसेच काही वाहनांना आग लावून पेटवून दिले होते. त्यानंतर रविवारी या घटनेचे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पडसाद उमटले. तळेगाव येथे घटनेच्या निषेधासाठी जमलेल्या जमावाने रास्ता रोको करून पोलीस वाहनांवर दगडफेक तसेच दोन वाहने रस्त्यावर पेटवून दिल्याची घटना घडली, त्यावर जमाव काबूत आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हे वृत्त वाºयासारखे पसरताच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करून वाहनांवर दगडफेकीच्या तसेच एस.टी. बसेस पेटवून देण्याच्या घटना घडल्या. वाडीवºहे, विल्होळी, गोंदे, घोटी, शेवगेडांग आदि ठिकाणी परिस्थिती चिघळून दोन दिवस तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचे पुरेपूर प्रयत्न करीत राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून समाजकंटकांची धरपकड सुरू केली, तर गोंदे, पाडळी येथे जमावाला पांगविण्यासाठी गोळीबाराच्या फैरी झाडाव्या लागल्या. शनिवार, दि. ८ ते बुधवार, दि. १२ या चार दिवसांच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्णांची पोलीस दप्तरात नोंद घेण्यात आली असून, २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही गुन्ह्णांमध्ये आरोपींची ओळख पटलेली नाही तर काही गुन्ह्णांमध्ये आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages