मुंबई 8 Nov 2016 ( प्रतिनिधी ) -मुंबईच्या बोरीवली येथील आर- मध्य विभागातील पालिकेतील सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करून, त्यांना सोमवारपर्यंत मूळ जागी नेमणूक करावी अशी भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याने मंगळवारी सर्वपक्षीय अकरा नगरसेवकांनी बोरीवली कार्यालयात उपोषण छेडले.
मागील आठवडयात गांधी यांची बदली केल्याच्या निषेधार्थ शनिवारी भाजप वगळता सर्वच पक्षातील नगरसेवकांनी काळया फिती लावून आर- मध्य विभागात ठियया आंदोलन केलं होतं. या आंदोलनात स्थानिक रहिवाशी आणि समाजसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. भाजप मंत्रयाच्या दबावामुळेच ही बदली केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. या आंदोलनात भाजपचे नगरसेवक सहभागी झाले नव्हते. त्यावेळी आंदोलनकर्ते नगरसेवकांनी पालिका उपायुक्त अशोक खैरे यांची भेट घेऊन, गांधी यांची बदली रद्द करण्याची मागणी करीत निवेदन सादर केले होते. तसेच सेामवारपर्यंत गांधी यांची मूळ पदावर पून्हा नेमणूक करा, अन्यथा आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही प्रशासनाला दिला होता. मात्र प्रशासनाकडून नगरसेवकांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आर मध्य विभागात ठियया मांडून उपोषण छेडले आहे. मनसेचे नगरसेवक चेतन कदम, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका संध्या दोषी, काँग्रेसचे शिवानंद शेट्टी यांच्यासह ११ नगरसेवक उपोषणास बसले आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या उपोषणाला संध्याकाळ पर्यंत पालिका प्रशासनाकडून एकही अधिकारी फिरकला नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. यापुढे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, याबाबत लवकरच पुढची दिशा ठरवणार असल्याचे स्थानिक नगरसेविका शितल म्हात्रे यांनी दिली आहे