मुंबई : "टाटा "च्या खासगी सुुरक्षा रक्षकांकडून वृत्तपत्र छायाचित्रकारांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ, सोमवारी दुपारी १२ वाजता टाटा समूहाच्या मुंबईतील फोर्टमधील बॉम्बे हाउस या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘टॉप्स’ खासगी सुरक्षा कंपनी उद्योग समूहातून हटविण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
मुंबई प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली विविध पत्रकार संघटना त्यामध्ये सहभागी होणार असून, त्यामध्ये मुद्रित व दृकक्षाव्य माध्यमातील संपादक, पत्रकारांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी करण्यात आल्याने, देशभरात हा चर्चेचा विषय बनला आहे. त्याबाबत शुक्रवारी संचालक मंडळांची बैठक बॉम्बे हाउसमध्ये होणार होती. या वेळी मुख्यालयाबाहेर प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी सकाळपासून थांबून होते. सायरस मिस्त्री हे बैठकीसाठी जात असताना, त्यांचे छायचित्र घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या छायचित्रकारांना खासगी सुरक्षा रक्षकांनी अडवून मारहाण केली. टाटा उद्योग समूहाने त्यांच्याकडे कार्यरत असलेली टॉप्स सुरक्षा कंपनी तातडीने हटविण्यात यावी, यासाठी सोमवारी बॉम्बे हाउसवर मुंबई प्रेस क्लबतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागणीची पूर्तता होत नाही, तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पत्रकार संघटनांनी केला आहे.