नवी दिल्ली : देशभरातल्या विमानतळांची सुरक्षा काटेकोर करण्यासाठी १ जानेवारीपासून विमानतळ कर्मचार्यांना आधार कार्ड आधारित ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. विमानतळावर कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचार्यांना आता आधार क्रमांकावर आधारित ओळखपत्र घ्यावे लागणार आहे.
विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने देशभरातील सर्व विमानतळांवरील कर्मचार्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक ते आदेश नागरी हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोने जारी केले आहेत. विमानतळांवरील वेगवेगळय़ा विभागांत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्यांना आता आपल्या ओळखपत्रासोबत आधार कार्ड किंवा आधार क्रमांक असलेलेच ओळखपत्र बाळगावे लागणार आहे. ज्या कर्मचार्यांकडे त्यांच्या एम्प्लॉयरने दिलेली ओळखपत्रे आहेत, त्यांना नवी ओळखपत्र बदलून घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात त्यांनी आपले आधार कार्ड ओळखपत्रासोबत बाळगायचे आहे. विमानतळांवर प्रवेश करण्यासाठी अनेक समाजकंटक बनावट विमानतळ प्रवेश पास तयार करतात किंवा अन्य कर्मचार्यांचा प्रवेश पास वापरतात. हे दोन्ही प्रकार टाळण्यासाठी प्रत्येकाला आधार क्रमांकावर आधारित प्रवेश पास अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळावरील कर्मचार्यांकडे असलेल्या सध्याच्या प्रवेश पासमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे आणि त्या कार्डचे सहजपणे बनावट नक्कल करता येणे शक्य असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एआयएसएफचे महासंचालक ओपी सिंह यांनी स्पष्ट केले.