मुंबई, दि. 17 : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून देशातील निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. शालेय विद्यार्थ्यांनी देशातील ही निवडणूक प्रक्रिया समजून घेत वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नावनोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी आज येथे केले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मतदानविषयक जागृती व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी आज आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून चर्चा केली. यावेळी अश्वनी कुमार बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून मतदानाची वयोमर्यादा, मतदान हक्क, मतदानासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, राष्ट्रीय मतदान दिवस आदी विविध मतदानविषयक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी, आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका विपनजोत सचदेव, मुंबई शहरच्या उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी -आरोलकर आदी यावेळी उपस्थित होते.