मुंबई. (प्रतिनिधी ) – सरकारची कार्यपद्धती हि स्पष्टपणे गरीब सर्वसामान्यांना उध्वस्त करणारी असून हे सरकार म्हणजे ब्रिटिश आणि मोघलाई राजवटीच्याही एक पाऊल पुढे असल्याचा घणाघाती आरोप श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आज केला. त्र्यंबक नगरपरिषदेने कुंभमेळाव्याच्या नावाने झोपड्या आणि टपऱ्या उद्धवस्त केल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात ते बोलत होते. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी मोर्चाला सामोरे न जाता पळ काढल्याने आंदोलक अत्यंत संतप्त आणि आक्रमक झालेले दिसले.
नाशिक मध्ये झालेल्या कुंभ मेळाव्याच्या नावाने सरकार आणि नगरपरिषदेने येथे वर्षनुवर्षे राहणाऱ्या गरीब आदिवासी कष्टकाऱ्यांच्या झोपड्या उद्धवस्त केल्या, रस्त्यालगतची पक्की बांधकामं न पडता सर्व सामान्यांच्या गरीबांच्या झोपड्या, घरे आणि टपऱ्या पाडण्यात आल्या. याबाबत श्रमजीवी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत आज त्र्यंबक नगरपरिषदेवर धडक दिली. 1971 सालीच्या इंडोपाक युद्धात भारतीय सैन्यात लढलेले रामराव लोंढे या माजी सैनिकाला यांनी मिळालेल्या भूखंडावर बांधलेले त्यांचे राहते घर देखील पाडण्यात आले. एक देशभक्त सैनिकांच्या घरापेक्षा साधू आणि कर्मकांडाला प्राधान्य देणारे सरकार म्हणजे बेगडी देशभक्ती करणारे सरकार आहे, सैनिकांच्या बाबतीत इतके क्रूर वागणारे सरकारने देशभक्तीला काळिमा फासला असल्याचे संतप्त मत माजी सैनिक रामराव लोंढे यांनी व्यक्त केले. ते ही या आंदोलनात सहभागी झाले होते. 1995 पूर्वीच्या झोपड्या नियमाकुल करण्याचे निर्देश असताना या झोपड्या पाडण्याचे काम करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज हजारो श्रमजीवी मोर्चाने आज त्र्यंबक नगरपरिषदेवर धडकले, नेहमीच मोर्चापासून पळ काढणाऱ्या मुख्याधिकारी डॉ.चेतना केरुरे यांनी आजही बैठकीचे कारण दाखवत नेहमीप्रमाणे पळ काढला. आंदोलकांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी आल्याशिवाय चर्चा न करता आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करत नगरपरिषद कार्यालयाचा ताबा घेत आंदोलन सूरु ठेवले. सायंकाळी 4.30 पर्यंत मुख्याधिकारी आल्या नसल्याने आंदोलन सुरूच होते. यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित, सरचिटणीस विजय जाधव, भगवान मधे, रामराव लोंढे, तुकाराम लचके, अशोक लाहंगे,तानाजी शिंदे आणि इतर पदाधिकारी आणि सभासद सहभागी होते.