पूर्णा प्रकरण - उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2017

पूर्णा प्रकरण - उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही


मुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसून आंदोलन करू -
आंबेडकरी जनतेचा इशारा -
मुंबई / प्रतिनिधी - परभणीतील पूर्णा येथे डॉ. आंबेडकर जयंती दरम्यान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड झाल्याने आंबेडकरी संघटनांकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला रितसर परवानगी देण्यात आली होती मात्र ऐनवेळी कलानगर खेरवाडी येथील आंबेडकर उद्यानाजवळ मोर्चा अडवल्याने सदर मोर्चा स्थगित करत यांपुढे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, वेळ प्रसंगी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर धडक देऊ असा इशारा पूर्णा अत्याचार निवारण कृती समिती, संविधान गौरव बहुजन महामोर्चा व आंबेडकर ब्रिगेडचे अशोक कांबळे यांनी यावेळी दिला.

परभणी पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक महादेव मंदिर मराठा गल्ली या ठिकाणी आली असता मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. सामाजिक वातावरण दूषित करण्यात आले. याला खासदार संजय उर्फ बंडू जाधव व नगराध्यक्ष संतोष एकलारे जबाबदार आहेत. यामुळे जाधव व एकलारे यांच्यावर शिवसेना पक्षाने कारवाई करावी म्हणून मातोश्रीवर मोर्चा काढण्यात आला. खेरवाडी येथील आंबेडकर उद्यानाजवळून मातोश्रीकडे मोर्चा नेण्याची पोलिसांनी परवानगी दिली होती मात्र ऐनवेळी मोर्चा सुरु होण्या आधीच मातोश्रीकडे जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे अशोक कांबळे यांनी सांगितले.

आम्ही संविधानिक मार्गाने मोर्चा काढत होतो मात्र पोलिसांकडून दडपशाही करून मोर्चा काढण्यास नाकारल्याने जमलेल्या आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा स्थगित करून यानंतर मोर्चा न काढता थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमात तसेच मुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसून आंदोलन करण्याचा इशारा उपस्थितांनी दिला. आंबेडकरी समाजाच्या मोर्चाला उद्धव ठाकरे यांची भेट पोलिसांनी होऊ न दिल्याने आता थेट कार्यक्रमात घुसू असा इशारा अशोक कांबळे यांनी दिला. दरम्यान उद्धव ठाकरे भेट न झाल्याने मोर्चेकरांनी पोलिसांना निवेदन देण्याचे टाळले असे कांबळे यांनी सांगितले. यापुढे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या दालनात जे आंदोलन होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि पोलीस जबाबदार असतील असा इशारा मोर्चेकरांनी दिला.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी अशोक काबंळे, श्याम काबंळे, अजय कांबळे, विजय कांबळे, विजय जोहरे, अशोक खैरे, प्रकाश दाहीजे, समाधान सभाकर, राम मगरे, अजय कांबळे, विशाल अडसुळ, दामोदर गुरुजी इत्यादींनी विशेष मेहनत घेतली 

आंबेडकरी नेत्यांना काळे फासणार - 
आंबेडकरी समाजाची आज जी अवस्था झाली त्याला आंबेडकरी नेते जबाबदार आहेत. समाजाला भक्कम नेतृत्व मिळत नाही. जे नेते आहेत ते आपली राजकीय पोळी भाजण्यात गुंग असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. आंबेडकरी नेत्यांमुळे समाजातही फूट पडली आहे. याचा निषेध म्हणून आंबेडकरी नेते जिथे भेटतील तेथे त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी "नेता छोडो समाज जोडो" अभियान राबविण्यात येणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.

डीसीप कार्यालयावर मंगळवारी मोर्चा - 
मुंबईमधील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जातीमधील अलका साळवे या महिला कर्मचारीला जातीवाचक शब्द वापरून गुंडांकडून मारहाण करण्यात आली. महिला पोलीस कर्मचारील मारहाण व शिवीगाळ केल्यानंतर अद्याप पोलिसांनी आरोपी विरोधात कोणतीही कारवाई केलेली नसल्याने पोलीस उपायुक्त कार्यालय माटुंगा येथे २५ एप्रिल मंगळवारी दुपारी २ वाजता आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाई कांबळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad