रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक

मुंबई, दि. 6 : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असून, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयुटीपी) 2 अंतर्गत ठाणे-दिवा दरम्यान 5 व 6 वी रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे. या कामाच्या देखरेखीकरिता अधिका-यांची नेमणूक करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकांना ‘मल्टी फॅसिलिटी कॉरिडॉर’(बहुसुविधा क्षेत्र) करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
एमयुटीपी 2 व 3 प्रकल्पाच्या अंतर्गातील कामांसंदर्भात अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार ॲड. पराग अळवणी, ॲड. आशिष शेलार, संजय केळकर, अमित साटम यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई व उपनगरातील रेल्वे सेवांकरिता अधिक सुधारणा करण्यासंदर्भात मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेल्या नागरी परिवहन प्रकल्प टप्पा – २ (एमयुटीपी) च्या आराखड्यानुसार प्रकल्पास सुरवात करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने १२० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. १२ डब्यांच्या नवीन गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. रेल्वेमार्गाच्या १७२ विद्युत प्रवाहाचे डीसी वरून एसी प्रवाहात परिवर्तन केले. २५०० प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ठाणे – दिवा दरम्यान ५ व ६ वी मार्गिका टाकण्याचे काम मार्च २०१९ पर्यंत, अंधेरी ते गोरेगांव हार्बर मार्गाचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत, मुंबई सेंट्रल ते बोरीवली ६ रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम मार्च २०२१ पर्यंत, सीएसटी ते कुर्ला दरम्यान ५ व ६ वी रेल्वे मार्गिका मार्च २०२१ पर्यंत टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुनर्विकासासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुनर्विकासाचा खर्च प्रकल्पाच्या खर्चात अंतर्भूत असून, एमएमआरडी प्रकल्प बाधितांना घरे उपलब्ध करून देते. 2500 जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. यापुढे अशा बाधितांचे जवळच्या परिसरात पुनर्वसन करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच, रेल्वे ट्रॅकच्या बाजूने असणा-या झोपडपट्ट्यांचे परिशिष्ट एसआरए मार्फत तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. स्थानकाच्या बाहेरील क्षेत्रफळ वाढवताना ट्रॅफिक मॅनेजमेंटचा विचार करणेही आवश्यक असल्याने घनता वाढविण्यासंदर्भात आवश्यक ती सवलत राज्य शासन देईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Post Bottom Ad