मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी 350.53 कोटीच्या आराखड्यास मंजूरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी 350.53 कोटीच्या आराखड्यास मंजूरी

Share This

मुंबई, दि. 29 : मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकसीत आराखडा निर्माण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना 2017-18 च्या 350.53 कोटींच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली. शालेय शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील चेतना महाविद्यालय येथे आयोजित आज झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत ही मान्यता देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना 2017-18 साठी राज्यस्तरावर अंतिम करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या योजनेमध्ये सर्वसाधारण योजना 294.20 कोटी, आदिवासी उपयोजना 06.59 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 49.74 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

या बैठकीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, आमदार अनिल परब, आशिष शेलार, अतुल भातखळकर, कपील पाटील, पराग अळवणी, प्रवीण दरेकर, अमित साटम, भाई गिरकर, सुनिल प्रभु, प्रकाश सुर्वे, अस्लम शेख, संजय लटके, सरदार तारा सिंह, मनिषा चौधरी, भारती लवेकर, विद्याताई चव्हाण तसेच खाजदार संजय राऊत, गजानन किर्तीकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त युपीएस मदान, अतिरिक्त मनपा आयुक्त संजय देशमुख, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे आयुक्त झेंडे तसेच संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मान्सून पूर्व तयारी व आपत्तकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना यावर विविध मान्यवरांनी आपआपल्या भागातील विविध समस्या मंत्री महोदयांसमोर मांडून यावर उपाय योजना करण्यासाठी चर्चा केली. प्रत्येक मान्सूनमध्ये खड्डे, वाहतूक याबाबतच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाळा सुरु होण्याअगोदर यावर कार्यवाही करावी, जेणे करुन या समस्या पावसाळ्यात निर्माण होणार नाहीत, अशा सूचना तावडे यांनी केल्या.

मुंबई महानगरपालिकेमध्ये मेट्रोची कामे चालू आहेत त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहेत यावर उपाययोजना म्हणून योग्य त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही तावडे यांनी दिले. मुंबई उपनगर शहरातील पूर्व व पश्चिम महामार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले. याबाबत एमएमआरडीएने विभागनिहाय आमदारांची बैठक घेऊन मतदार संघात महामार्गाबाबतच्या येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश तावडे यांनी दिले.

मुंबई उपनगर व शहरामध्ये पाणी साठण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अशा ठिकाणी मोठे पंपींग स्टेशन उभे करण्यात यावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. पावसाळयामध्ये उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येमुळे अधिक कर्मचारी उपलब्ध करुन यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुंबईत पार्कींग समस्येवर अतुल भातखळकर यांनी मुद्दा मांडला होता. यावर बोलताना पार्कींग समस्येवर निविदा काढून तात्काळ कामे मार्गी लावावीत, असे तावडे यांनी सांगितले.

या बैठकीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता ओबी व्हॅनचे उद्घाटन पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages