'एम पूर्व' विभागात १३ हजार ७०० किलो बर्फ जप्त करुन नष्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2017

'एम पूर्व' विभागात १३ हजार ७०० किलो बर्फ जप्त करुन नष्ट

मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांकडील ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले होते. अतिसार, जुलाब, कावीळ इत्यादी जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणा-या इ-कोलाय बाधीत बर्फाचे प्रमाण 'एम पूर्व' विभागात ९७ टक्के असल्याचेही आढळून आले असून याच विभागात एप्रिल मध्ये ९७ अतिसाराचे रुग्ण देखील आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर 'एम पूर्व' विभागात अनधिकृत फेरीवाले ,सरबत विक्रेते ,खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. उपायुक्त (परिमंडळ - ५) भारत मराठे यांच्या मार्गदर्शनात गेल्याकाही दिवसात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १३ हजार ७०० किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती 'एम पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.


पालिकेच्या 'एम पूर्व' विभागाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ८ लाख ६ हजार ४३३ एवढी आहे. या विभागामध्ये गोवंडी, देवनार, मानखुर्द, तुर्भे शिवाजी नगर, भारत नगर, गणेश नगर, सह्याद्री नगर, अयोध्या नगर, गौतम नगर, विष्णू नगर इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या विभागासह पालिकेच्या इतरही काही विभागांमध्ये अतिसार बाधीत रुग्णांचे प्रमाण वाढले आहेत याच भागांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ , पेयपदार्थ बर्फ नमुन्यांची व पाणी नमुन्यांची चाचणी केली असता त्यात इ-कोलाय जीवाणू बाधीत नमूने मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका क्षेत्रातील अनधिकृत खाद्यपदार्थ , पेयपदार्थ विक्रेत्यांविरोधात सुरु असलेली मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते.

13 हजार 700 किलो बर्फ जप्त -पालिकेच्या 'एम पूर्व' विभागात देखील पेयपदार्थ , खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान गेल्याकाही दिवसात तब्बल १३ हजार ७०० किलो एवढा बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. याचसोबत १३५ सरबत ,द्रव्य देखील नष्ट करण्यात आले आहे. तसेच अन्नपदार्थ, सडलेली फळे, निकृष्ट गोडपदार्थ इत्यादी देखील मोठ्या प्रमाणात जप्त करुन नष्ट करण्यात आले आहेत. तसेच ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचेही किलजे यांनी सांगितले.

रर-त्यांवरील उघडे पदार्थ खाऊ नये -पालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमून्यांमध्ये आढळून आलेले इ-कोलाय जीवणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी - सरबत – उसाचा , फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या -जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.

Post Bottom Ad