घाटकोपर रामजी नगरमधील पाणीपुरवठा खंडीत - रहिवाश्यांचे उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर रामजी नगरमधील पाणीपुरवठा खंडीत - रहिवाश्यांचे उपोषण

Share This

मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर पश्चिमेचा रामजी नगर हा डोंगराळ भाग असून या भागातील पाण्याच्या टाकीचे 16 लाख 33 हजार रुपयांचे बिल थकले आहे. पाण्याच्या टाकीची देखभाल करणाऱ्या संस्थेने महापालिकेकडे बिल भरले नसल्याने महापालिकेने या विभागातील पाणीपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे रहिवाशी त्रस्त झाले असून येथील रहिवाश्यानी महापालिकेच्या एन वॉर्ड कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे.


घाटकोपर मधील डोंगराळ भागात दरवर्षी पाण्याची समस्या असते. असाच डोंगराळ भाग असलेल्या रामजी नगर येथील पाण्याच्या टाकीची देखभाल करण्याची जबाबदारी शिवनेरी सेवा सामाजिक संस्थेला देण्यात आली आहे. शिवनेरी सेवा मंडळाने नागरिकांकडून पाण्यासाठीची पैसे घेतले असले तरी 2013 पासूनचे पाणी बिल भरलेले नाही. मंडळाने पाण्याचे बिल भरण्यासाठी दिलेला चेक बाउंस झाल्याने एन वॉर्ड कार्यालयाने येथील पाणीपुरवठा खंडीत केला आहे.

शिवनेरी सेवा मंडळाकडून देखभाल केल्या जाणाऱ्या टाकीमधून जवळपास ६५० घरांना पाणीपुरवठा केला जातो. शिवनेरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश भागणे यांच्याकडे वेळोवेळी बिल भरले होते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी मंडळाकडून बिल वसूल केले पाहिजे. या प्रश्नाकडे महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका लक्ष देत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला उपोषण करावे लागत आहे,'' असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

रहिवाश्यांची फसवणूक बंद करू - महापालिकेला पाण्याच्या टाकीची पद्धत बंद करुन सर्व रहिवाशांना मुख्य जलवाहिनीशी जोडलेले पाण्याचे नळ द्यायचे आहेत. या नळांसाठी प्रत्येकी पाच रहिवाशांमध्ये एक मीटर असेल. जेणेकरून रहिवाशांना स्वत: वॉर्ड कार्यालयात येऊन पाण्याचे बिल भरता येईल. ही नवीन संकल्पना पालिका लवकरच राबवणार असून एन वॉर्डातील रामजी नगरपासून त्याची सुरूवात होणार आहे.
> राजन प्रभू - जल अभियंता, एन वॉर्ड, महानगरपालिका 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages