आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात मुंबईतील विविध विषयांवर भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईत कारवाई होत असलेल्या धार्मिक स्थळांचा विषयची मांडला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महानगर पालिकेतर्फे मुंबईतील फुटपाथ व रस्त्यावरील धार्मिक स्थळांवर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निष्कासनाची कार्यवाही करण्यात येत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगर पालिकेतर्फे मुंबईतील फुटपाथ व रस्त्यावरील धार्मिक स्थळांची पाहणी करून व त्यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे अ व ब अशी वर्गवारी करण्यात आली होती. यातील अ वर्गवारीतील धार्मिकस्थळांना अधिकृत घोषित करण्यात आले. तसेच ब वर्गातील धार्मिक स्थळांना अनधिकृत घोषित करून त्यांच्यावर निष्कासनाची कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु या ब वर्गातील अनेक धार्मिक संस्थाकडे त्यांचे मंदिर, मस्जिद, क्रॉस इ. संदर्भातील अनेक कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत असे दिसून येते. सदर धार्मिक स्थळे ही नागरिकांची श्रद्धास्थाने असून त्यांवर कारवाई केल्याने समाजात रोष निर्माण होईल तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
दि. २९ एप्रिल २०१७ रोजी वाद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात खाजगी जागेत असलेल्या क्रॉस वर महानगर पालिकेतर्फे निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली होती. यामुळे त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच सदर क्रॉस हा खाजगी जागेत असून हा क्रॉस महानगर पालिकेने अनधिकृतपणे निष्कासत केला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आपण या प्रकरणी सदर क्रॉस वर केलेल्या निष्कासनाची चौकशी करण्यासाठी व ब वर्गातील अनेक धार्मिक संस्थाना आपले म्हणणे मांडून धार्मिकस्थळांची कागदपत्रे सादर करण्याची पुन्हा संधी देण्यासाठी यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी महापालिकेने तपासून योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश दिल्याने या धार्मिक स्थळांना पुन्हा आपली कागदपत्रे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.