मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता १०वीचा निकाल गेले ३ वर्षे सातत्याने वाढला असताना यावर्षी मात्र हा निकाल मागील वर्षाच्या निकालपेक्षा १० टक्यांनी कमी झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता १० विच्या परीक्षेसाठी १४६ शाळांमधून ११९७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८२४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी पालिका शाळांचा १० वीचा निकाल ६८.९० टक्के लागला आहे. मुंबई महापालिकेच्या १० वीच्या १४६ शाळांपैकी महापालिकेच्या एम पूर्व विभागातील ट्रॉमबे म्युनिसीपल शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. १५ शाळांचा निकाल ९० टक्क्याहून अधिक लागला आहे. तर इ विभागातील मोतीशहा शाळेचा निकाल २८.५७ टक्के व जी उत्तर मधील न्यू एल आय रोड शाळेचा निकाल ३३.३३ टक्के इतका कमी लागला आहे.
सन २०१४ ला इयत्ता १०वीच्या परीक्षेसाठी मुंबई महानगरपालिका शाळांमधून ११३०३ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ७८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी पालिका शाळांचा निकाल ६९.६० टक्के लागला होता. सन २०१५ ला १०७८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सन २०१५ मध्ये ७२.५४ टक्के निकाल लागला होता. सन २०१४ पेक्षा सन २०१५ सालचा निकाल ३ टक्क्यांनी वाढला होता. सन २०१६ मध्ये १०७८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सन २०१६ मध्ये ७७.५० टक्के निकाल लागला असून सन २०१५ पेक्षा सन २०१६ मध्ये ५ टक्क्यांनी निकालात वाढ झाली होती. सन २०१७ मध्ये ६८.९० टक्के निकाल लागला असून सन २०१६ मध्ये लागलेल्या ७७.५० टक्के निकाला पेक्षा निकाल ९.६ टक्क्यांनी कमी लागला आहे.