मुंबई - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या योजनेच्या लाभासाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या यादीत कृषी व संलग्न पदवी या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयांमुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागासह कृषी - पशुसंवर्धन - दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश (केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून) घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासह या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने गेल्या ऑक्टोबरमध्ये घेतला होता.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेसाठी निश्चित केलेल्या निवडक अभ्यासक्रमांच्या यादीत कृषी व संलग्न विषयाच्या पदवी,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पात्रतेसाठी दहावी अथवा बारावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याची अट शिथिल करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील काही पदविकाधारक विद्यार्थी निवडक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी 10 वीच्या परीक्षेत 60 टक्के गुणांच्या अटींऐवजी संबंधित पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत किमान 50टक्के गुण मिळविणे आवश्यक करण्यात आले आहेत. तसेच या निर्णयांमुळे पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम सुलभ आणि तात्काळ मिळावी यासाठी ती पात्र लाभार्थ्यांच्या आधारसंलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेतील अटीप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांस काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानुसार लाभार्थी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनामध्ये शिक्षणासाठी वर्गात उपस्थित राहणे व प्रत्येक सत्रात अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहील. पात्र लाभार्थी विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतल्यानंतर एखाद्या सत्राची (सेमिस्टरची) परीक्षा दिली नसल्यास अथवा एखाद्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता असा विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र राहील. मात्र, त्यानंतर पुन्हा त्या सत्रात अथवा वर्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अथवा अंशत: पास (ATKT) झाल्याने त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास या योजनेच्या लाभासाठी पुन्हा पात्र ठरेल. परंतु असे पात्र लाभार्थी विद्यार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्या पेक्षा अधिक वेळा पूर्णत: अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणित वर्षासाठी प्रवेश मिळाला नसेल तर संबंधित विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी या योजनेंतर्गत लाभाकरिता कायमस्वरुपी अपात्र ठरेल.
या योजनेच्या लाभासाठी आधारसंलग्नीत बायोमॅट्रीक उपस्थिती प्रणालीमध्ये किमान 50 टक्के शैक्षणिक उपस्थिती आवश्यक असेल. तसेच सदर योजनेंतर्गत जे विद्यार्थी शासकीय किंवा अशासकीय वसतिगृहात अथवा भाडेतत्त्वावर शैक्षणिक प्रयोजनार्थ वास्तव्य करीत असल्यास त्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.