
मुंबई । प्रतिनिधी -
कोंकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसमधील 24 प्रवाशांना खाण्यातून विषबाधा झाली आहे. बाधितांना तातडीने चिपळूनमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाधितांपैकी 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हि एक्सप्रेस मडगावहून मुंबईकडे येत होती. अत्याधुनिक सुविधा असलेल्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय आजच्या घटनेमुळे प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
तेजस एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्स्प्रेस असून दर रविवारी करमळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. आजही तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र चिपळूनच्या जवळपास पोहोचताच अनेक प्रवाशांना त्रास जाणवू लागला. ज्यांना त्रास जाणवू लागला अशांची संख्याही मोठी होती. अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तेजस चिपळून स्टेशनवर थांबवण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला 5 ते 6 प्रवाशांना तातडीने चिपळून शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ज्यांना प्रवाशांना त्रास जाणवू लागला आहे, अशांची संख्या 40 पेक्षा अधिक असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. ही विषबाधा नेमक्या कोणत्या अन्नातून झाली याचा तपास सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.