फेरिवाल्यांचा १ ऑक्टोबरला धडक मोर्चा -
मुंबई । प्रतिनिधी - महापालिका आणि रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केलेल्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करता सरसकट फेरीवाल्यांवर कारवाई जात असल्याने या कारवाई विरोधात मुंबई हॉकर्स युनियनने 1 नोव्हेंबरला धडक मोर्चाची हाक दिली आहे, अशी माहिती कामगार नेते शशांक राव यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघातील आयोजित परिषदेत ते बोलत होते. दरम्यान मनसेने फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने कारवाईचा इशारा दिला आहे याबाबत बोलताना कष्टकरी माणसांचीही स्टाईल असते या स्टाईलचा सामना मनसेला करावा लागले, असा स्पष्ट इशारा राव यांनी दिला. यामुळे येणाऱ्या काळात फेरीवाला आणि मनसे आपसात भिडणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.
एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी संतप्त मोर्चा काढला. यावेळी दुर्घटनेसाठी अरुंद पुलाइतकेच पादचारी पुलांवर ठाण मांडणारे फेरीवालेही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पदपथ, पूल, रस्ते फेरीवालामुक्त करण्यासाठी त्यांनी महापालिकेला 15 दिवसांची मुदत ही दिली. या मुदतीत फेरीवाल्यांना न हटविल्यास मनसे स्टाईल दाखविण्याचा इशारा राज यांनी दिला होता. मुंबई महापालिकेने त्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला. ही कारवाई करताना फेरीवाला धोरणाचा पालिकाला विसर पडला आहे. केंद्र सरकारने 2014 मध्ये फेरीवाला धोरण तयार केले. मात्र, अद्याप याधोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. उलट फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करुन बेकायदेशीर कारवाया केल्या जातात. त्या तातडीने थांबवाव्यात व फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, प्रत्येक वॉर्डमध्ये टाऊन व्हेंडिग कमीटी तयार करावी, त्यात फेरीवाल्यांचा एका प्रतिनिधीची निवड करावी, या कायद्यातील तरतूदीनुसार फेरीवाले ज्या जागेवर फेरीचा धंदा करतात, त्या जागेवर त्यांची नोंदणी करुन धंदा करण्याचे परवाने द्यावेत. शिवाय, जोपर्यंत फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करु नये, अशी मागणी शशांक राव यांनी केली आहे. मुंबईत 2000 च्या सर्वेनुसार 1 लाख 8 हजार फेरीवाले होते. रेल्वे हद्दीत 15 हजार फेरीवाले असून त्यात मराठी महिलांचे प्रमाण 80 टक्के आहे. मग मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करणारे राज ठाकरे या मराठी फेरीवाल्यांच्या पोटावर लाथ मारणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित यावेळी केला.
महागाईच्या काळात मुंबईत सुमारे 80 टक्के नागरिकांना मॉल व दुकानातून वस्तू विकत घेणे परवडत नाहीत. त्यामुळे फेरीवाल्यांकडून अल्प दराने मिळणारे भाजीपाला, फळे, किरकोळ नियमीत वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दुकानांपेक्षा कमी किंमतीत वस्तूंची विक्री करुन हे फेरीवाले कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. गेल्या 40 वर्षापासून हे फेरीवाले व्यवसाय करत आहेत. फेरीवाल्यांबाबत कायदा आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मात्र कायदा कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कष्टकरी माणसे हे कदापी सहन करणार नाहीत, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.