मुंबई । प्रतिनिधी -
दिवाळी निमित्त बोनस देण्याची प्रथा अनेक आस्थापनात आहे. दिवाळी निमित्त सर्व आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना बोनस वाटप होत असताना बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना मात्र बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नसल्याने भाऊबीजच्या दिवशी बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. रक्षाबंधन साजरी केली आता भाऊभीजही साजरी करू असे म्हणत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे सुहास सामंत आणि शशांक राव यांनी हा संपाचा इशारा दिला आहे.
बेस्ट उपक्रमावर चार हजार कोटी रूपयांचे कर्ज असल्याने बेस्ट आर्थिक अडचणीत आहे. बेस्टला आर्थिक मदत करावी म्हणून मुंबई महानगर पालिकेकडे आर्थिक मदत मागितली असता पालिकेला त्याला नकार दिला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी याआधीही बेस्टला पालिकेनं आपल्यामध्ये सामावून घ्यावे, बेस्टल;आ आर्थिक अनुदान द्यावे इत्यादी मागण्यांसाठी उपोषण केले होते. या उपोषणांकडे पालिका आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी संप केला होता. या संपादरम्यान शिवसनेंना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका बेस्टची जबाबदारी घेईल, कर्मचाऱ्यांना १० तारखेपर्यंत पगार मिळेल, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेतला जाईल असे आशवसं दिले होते. मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना १४ हजार ५०० बोनस जाहीर करताना पालिका आयुक्तांनी बेस्ट आर्थिक तोट्यात असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे संतापलेले बेस्ट कर्मचारी १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान वडाळा डेपो बाहेर उपोषण करणार आहेत. त्यानंतरही दिवाळी पर्यंत बोनस जाहीर न केल्यास २१ तारखेला भाऊबीज करायला जाणाऱ्या भावांना आपल्या बहिणेकडे घेऊन जाणारे बेस्ट कर्मचारी आपली भाऊभीज करायला आपल्या बहिणीकडे जातील त्यामुळे बस सेवा बंद राहील असा इशारा कृती समितीने दिला आहे. तोट्यात चालणाऱ्या पिपरी चिंचवड मधील परिवहन कर्मचाऱ्यांना, एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. मग बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस का नाही असा प्रश्न सुहास सामंत व शशांक राव यांनी उपस्थित केला आहे. ऐन भाऊबीजच्या दिवशी बेस्ट सेवा बंद होणार असल्याने बेस्टचे करोडो रुपयांचे नुकसान होणार असून लाखो प्रवाशांचेही हाल होणार आहेत.