झाड पडून कांचन नाथ यांचा झाला होता मृत्यू
मुंबई । प्रतिनिधी 14 Nov 2017 -
चेंबूर येथील झाड पडून मृत्यू मुखी पडलेल्या कांचन नाथ यांचा मृत्यू पालिकेच्या चुकीमुळे झाला नाही. त्यांचा मृत्यू सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाला असल्याचा अहवाल महापालिकेने बनवला असून या प्रकरणातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कांचन नाथ यांच्या मृत्यू नंतर आलेला अहवाल साफ चुकीचा असल्याचा आरोप त्यांचा मुलगा राजेश्री नाथ यांनी केला आहे. या प्रकरणावरून पालिका आमची दिशाभुल करत असल्याने यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून नागरिकांना तक्रारी करता याव्यात म्हणून एक ऍप बनवणार असल्याचे राजश्री नाथ यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास व झाडाची तक्रार करणारे पोळ तसेच इतर चेंबूर मधील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
चेंबूर मधील स्वस्तिक पार्क येथे जुलै महिन्यात झाड पडून कांचन नाथ या महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र या दुर्घटनेचा अहवाल तयार करताना पालिका चौकशी अधिकाऱ्यांनी आपली असवेंदनशीलता दाखवली असल्याचे उघड झाले आहे. सदर अहवालात झाड पडण्यास सोसाट्याचा वारा कारणीभूत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने आपले हात झटकले आहेत. पालिकेने आपले हात या प्रकरणातून झटकले असले तरी कांचन नाथ यांच्या मुलाने महापौरांची भेट घेत या अहवालावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत. महापालिकेने बनवलेल्या अहवालात सुरवातीला स्थानिक पोळ यांनी ऑनलाईन पद्धतीने झाडाबाबत माहिती दिली होती. झाडाबाबत माहिती प्राप्त झाल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली होती असे अहवालात नोंद आहे. अहवालाच्या शेवटी मात्र झाडाबाबत कोणतीही तक्रार पालिकेकडे आली नसल्याचे म्हटले आहे.
यामुळे एकाच अहवालात पालिकेने ऑनलाईन माहिती आल्याचे तर नंतर तक्रार आली नसल्याचे म्हटल्याने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांचन नाथ यांच्या मुलाने मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी आपल्याला या शहराचे नागरिक म्हणून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. कांचन नाथ यांच्या मृत्यू पश्चात आम्हाला पैसे नको असून आम्हाला न्याय हवा आहे असे राजश्री यांनी सांगितले. आमच्या सारखे अनेक नागरिक या शहरात आपल्याला न्याय मिळावा म्हणून झगडत असतील. त्यांना त्यांच्या तक्रारीचे काय झाले यासाठी पालिकेतील कार्यालयात खेपा माराव्या लागू नयेत, त्यांना घर बसल्या माहिती मिळावी म्हणून ऍप बनवणार असल्याचे राजश्री यांनी सांगितले.