मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. असाच पाणीपुरवठा मुंबईमधील पोलीस आणि शासकीय कर्मचारी वसाहतींनाही केला जातो. अश्या वसाहतींमधून रहिवाशी असलेल्या पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांकडून पगारातून घरभाडे, पाणी बिलाची रक्कम कापून घेतली जाते. मात्र ही रक्कम शासनाकडून मुंबई महानगर पालिकेला भरलीच जात नसल्याने अशा वसाहतींची तब्बल 95 कोटींहून जास्त रकमेची पाणीपट्टी थकलेली आहे. याबाबत महापालिकेकडून सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने पालिकेचा कोट्यवधीचा महसूल मात्र बुडाला आहे.
महापालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी जल अभियंत्यांकडून मुंबईमधील पाणीपट्टी थकवणाऱ्यांची माहिती जल अभियंत्यांकडून मागविली होती. यानुसार पाणीपट्टी थकवणार्या संस्थांचा रीसतर अहवाल जल अभियंत्यांनी तयार केला आहे. मुंबईतील 182 पोलीस वसाहती आणि 501 शासकीय कर्मचारी वसाहती अशा 683 वसाहतींनी पाणीपट्टी थकवली आहे. यामध्ये पोलीस वसाहतींनी 20 कोटी 8 लाख 65 हजार 385 रुपये तर शासकीय कर्मचारी वसाहतींनी 74 कोटी 5 लाख 58 हजार 577 रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. पोलीस आणि शासकीय कर्मचार्यांना घरे दिल्यावर त्यांची भाड्याची रक्कम आणि पाणीपट्टी पगारातून कापून घेतली जाते. मात्र या वसाहतींना पालिकेकडून या नियमित पाणीपुरवठा केला जात असताना पाणीपट्टी भरण्यास का टाळाटाळ केला जातो असा सवाल सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी केला आहे. त्यामुळे पालिकेचा कोट्यवधीचा महसूल थकित पाणीपट्टी तातडीने भरावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे नर यांनी सांगितले.
पाण्याचे बिल पाठवल्यानंतर 45 दिवसांत ती भरणे आवश्यक असते. मात्र काही संस्था, आस्थापने स्मरणपत्रे पाठवूनही पाणीपट्टी भरत नाहीत. या दिरंगाईमुळे आकारलेला दंडही संबंधितांकडून भरला जात नाही. शासकीय संस्था सोडून इतरांवर मात्र तातडीने पाणी कापण्याची कारवाई केली जाते. त्यामुळे पाणीपट्टी थकवणार्या शासकीय वसाहतींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पाणीपट्टी थकवणार्यांमध्ये कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस आणि शासकीय वसाहतींचा समावेश असल्याने कायद्याची अंमलबजावणी करायची कोणी?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पाणीपट्टी थकवणार्या वसाहती -
‘के’ ईस्ट अंधेरी पूर्व विभागात सर्वात जास्त पाणीपट्टी थकलेली आहे. मुंबईमधील एकूण 182 पोलीस वसाहतींपैकी ‘के’ ईस्टमधील 38 वसाहतींनी तब्बल 10 कोटी 63 लाखांची पाणीपट्टी थकवली आहे. तर याच विभागातील 108 शासकीय कर्मचारी वसाहतींनी 4 कोटी 78 लाख 12 हजार 879 रुपये थकवले आहेत. पोलीस वसाहतींच्या थकबाकीमध्ये एफ साऊथ विभागात - 1 कोटी 39 लाख, ‘जी’ साऊथ विभागात - 3 कोटी 75 लाख अशी मोठी थकबाकी आहे. ‘ई’ वॉर्ड विभागात - 13 कोटी 47 लाख, ‘एफ’ साऊथ विभागात - 3 कोटी 94 लाख, जी नॉर्थ विभागात - 24 कोटी 5 लाख, ‘जी’ साऊथ विभागात - 5 कोटी 73 लाख, ‘एल’ वॉर्ड विभागात - 4 कोटी 35 लाख, ‘एन’ वॉर्ड विभागात 10 कोटी 69 लाख पाणीपट्टी थकीत आहे.