मुंबई । प्रतिनिधी - कोपर्डी प्रकरणात सरकारने तत्परता व संवेदनशीलता दाखवून सव्वा वर्षात खटला निकाली काढला आहे. तितकी तत्परता आणि संवेदनशीलता अहमदनगर येथील नितीन आगे प्रकरणी दाखवलेली नाही. यामुळे दलित समाजात सरकारविरोधात प्रचंड असंतोष पसरला असल्याने नितीन आगे हत्येच्या खटल्याच्या निकालाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात अपील करून कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात नितीन आगे याच्या वडिलांसह ( राजू आगे ) मुणगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना २८ एप्रिल २०१४ ला जातीय वैमण्यास्यातून नितीन आगे या १७ वर्षाच्या बौद्ध तरुणाची सवर्ण समाजाच्या व्यक्तीकडून निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालवण्यात आला. परंतू त्याबाबतचे सर्व पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्याने अहमदनगर सत्र न्यायालयाने ९ आरोपीना निर्दोष सोडले. हि न्यायदानाची क्रूर चेष्ठा आहे. त्यामुळे नीताईंची आई, वडील, बहीण आणि लहान भाऊ निराधार झाले असल्याचे मुणगेकर यांनी सांगितले. यावेळी राज्य सरकारने अहमदनगर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च नायालयात त्वरित अपील करून नितीनच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, पुरावे नष्ट करणाऱ्यांना शिक्षा करावी, ऍट्रॉसिटी कायद्यानुसार भूमिहीन शेतमजूर असलेल्या नितीनच्या कुटुंबियांचे समाधानकारक पुनर्वसन करण्यात यावे, नितीनच्या कुटुंबियांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधून द्यावे अश्या मागण्या मुणगेकर यांनी केल्या.