मुंबई । प्रतिनिधी - दिव्यांग व्यक्तीसुध्दा समाजातील महत्वपूर्ण घटक असून दिव्यांगाप्रती नागरिकांची संवेदना वाढली तरच त्यांच्या समस्या सुटण्यास हातभार लागणार असल्याने त्यांच्याबद्दल नागरिकांची संवेदना वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगाचा सत्कार समारंभ यशवंत नाटयमंदिर, मांटुंगा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी २० दिव्यांग व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते शाल तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांगाचा आर्केस्टा सादर करण्यात आला.
याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा सान्वी तांडेल, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा सिंधू मसुरकर, नगरसेवक, नगरसेविका, उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (नियोजन) डॉ. संगिता हसनाळे विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सत्कारमूर्ती दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका दिव्यांगासाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करुन दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी आपल्या दिव्यांग मित्रांना महापालिकेच्या योजनांची माहिती द्यावी, जेणेकरुन जास्तीत जास्त दिव्यांगाना या योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच आपआपल्या प्रभागातील दिव्यांगाना नगरसेवक निधीतून काही योजनांचा लाभ देता येईल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका दिव्यांगासाठी विविध योजना राबवित असल्याबद्दल त्यांनी महानगरपालिकेचे कौतुक करुन या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा सिंधू मसुरकर यांनीही यावेळी मार्गदर्शन करुन चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महापालिकेचे कौतुक केले. त्याचप्रमाणे उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून विविध योजनांची माहिती दिली.