मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईमधील ऐतिहासिक अशा सायन किल्ल्यावर पालिका सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे सायन किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने सुरक्षरक्षकांची कमतरता असल्याची कबुली देताना सुरक्षेचा आढावा घेऊन खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाईल अशी माहिती दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिका रुग्णालयातील सुरक्षारकक्षकांबाबत चर्चा सुरु असताना भाजपाच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी सायन किल्ला व सायन तलाव परिसरात सुरक्षारकक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सायन तलाव व सायन किल्ला ही महत्वाची ठिकाणे आहेत. येथे दररोज अनेक पर्यटक भेटी देतात. सायन किल्ल्याच्या परिसरातील संरक्षक भिंतही तुटलेली आहे. त्याठिकाणी केवळ दोनच सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्या परिसरात एक अर्भक टाकण्यात आल्याचे आढळले होते, अशी तक्रार राजेश्री शिरवडकर यांनी केली.
त्यावर पालिका प्रशासनाने लेखी उत्तर देताना, सायन किल्ला परिसरात प्रत्येक पाळीत ४ याप्रमाणे तीन पाळ्यात १२ सुरक्षारक्षक नेमण्याची मंजुरी आहे. मात्र पालिकेच्या एफ /उत्तर विभागात सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने सायन किल्ला परिसरात सध्या प्रत्येक पाळीत २ याप्रमाणे ६ सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सायन किल्ला परिसरातील सुरक्षिततेचा आढावा घेऊन त्या ठिकाणी खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याची कार्यवाही करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने आपल्या उत्तरात म्हटले आहे.