आरक्षण - आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल - डॉ. उदित राज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2017

आरक्षण - आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल - डॉ. उदित राज


नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, बिहारमधील खासदार कीर्ती आझाद, भोलासिंह यांनी भाजपा विरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. भंडारा गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी तर बंडखोरी करून तडकाफडकी राजीनामाही दिला आहे. या यादीत आता खासदार उदित राज यांचीही भर पडली आहे. आरक्षण मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्याविरोधात आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल,’ असा इशारा डॉ. उदित राज यांनी दिला.

अनुसूचित जाती, जमातींच्या अखिल भारतीय महासंघाने मंगळवारी रामलीला मैदानावर आरक्षणाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान संपन्न झालेल्या जाहीर सभेमध्ये आरक्षण गुंडाळण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप डॉ. राज यांनी केला. ‘सरकारी नोकऱ्यांमधील भरती बंद केली आहे आणि आऊटसोर्सिंगच्या नावाखाली कंत्राटीकरण करून दलित, आदिवासींचा नोकऱ्यांमधील हक्क पद्धतशीरपणे डावलला जात आहे. त्याचबरोबर बढत्यांमधील आरक्षणातही खोडा घातला जात आहे. याविरुद्ध आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल,’ असा इशारा डॉ. राज यांनी दिला. त्यांनी थेटपणे मोदी सरकारचा उल्लेख करण्याचे टाळले.

डॉ. राज यांनी केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्यावरही टीका केली. धर्मनिरपेक्ष शब्दाला आक्षेप घेताना हेगडे यांनी राज्यघटना बदलण्याचे सूतोवाच केले होते. त्यावर डॉ. राज म्हणाले, ‘‘राज्याला कोणताच धर्म नसतो. म्हणून तर राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख आहे. तो वगळण्यास ठाम विरोध आहे. उद्या लोकशाही शब्द वगळण्याची मागणी कराल. भारतामध्ये तुम्हाला काय धर्मशाही आणायची आहे का?’ हेगडे यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS