
मुंबई, 7 Dec 2017 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. त्यांना 209 मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे दिलीप माने यांना 73 मते मिळाली. या निवडणुकीत एकूण 284 आमदारांनी मतदान केले. त्यापैकी दोन मते बाद झाली.
नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचीपोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण 284 आमदारांनी मतदान केले. एकूण 288सदस्यांपैकी एम आय एम पक्षाचे वारिस पठाण आणि इम्तियाझ शेख हे दोन सदस्य मतदानास अनुपस्थित होते. सदस्य छगन भुजबळ हे उपस्थित राहू शकले नाहीत, तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदान करता आले नाही. आज सकाळी 9 ते 4 या वेळेत विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मतदान पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यानंतर मतमोजणीला सुरूवात होऊन निर्णय जाहीर करण्यात आला.
काँग्रेसची १० मते फुटली -
या निवडणुकीत काँग्रेसची ८३ मते, तसेच शेकाप, माकप, सपा यांची पाच मते अशी किमान ८८ मते काँग्रेसच्या दिलीप माने मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्यापुढे काँग्रेसला केवळ ७३ मते मिळाली असून, थेट समीकरणात त्यांची १० मते या निवडणुकीत फुटल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ८३ मतांमधील १० मतेही त्यांनी स्वतःकडे खेचली. यातील नितेश राणे व कालिदास कोळंबकर ही दोन मते राणे यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने गृहित धरलीच नव्हती, असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे. मात्र तरीदेखील काँग्रेसची आठ मते फुटल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होते.