मुंबई । प्रतिनिधी - मुंबई शहरात झाडे कमी झाली असताना इमारतीच्या बांधकामाच्या आड आणि रेल्वे लाईनच्यामध्ये अडथळा ठरणारी ८० झाडे कापण्याचा तर ६२ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेना झाडे कापण्याच्या विरोधात असल्याने मंगळवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
मुंबईमधील पालिकेच्या डी विभागात नेपियन्सी रोड येथील एका नियोजित इमारतीच्या बांधकामाच्या कामात अडथळा आणणारी २६ झाडे कापण्यास तर १५ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी मागण्यात आली आहे. या ठिकाणी कापण्यात येणाऱ्या झाडांमध्ये चिकू, रिटा, चाफा, सोनचाफा, शेवगा, आंबा, अशोक, सुपारी, कैलास पत्ती झाडांचा समावेश आहे. या इमारतीच्या भूखंडावर एकूण ६२ झाडे असून २१ झाडे आहे तशीच ठेवली जाणार आहेत. तसेच सांताक्रूझ ते मिलन सबवे दरम्यान पश्चिम रेल्वेच्या प्रस्तावित सहाव्या लाईनच्यामध्ये अडथळा ठरणारी ५४ झाडे कापण्याचा तर ४७ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी मागण्यात आली आहे. याठिकाणी कापण्यात येणाऱ्या झाडांमध्ये पिंपळ, जंगली उंबर, चिंच, नारळ, शेवगा, इत्यादी झाडांचा समावेश आहे. या ठिकाणी २१२ झाडे असून त्यापैकी १११ झाडे आहे तशी ठेवली जाणार आहेत. रेल्वेकडून कापण्यात आणि पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे १५ दिवसात रेल्वे वसाहतीच्या मोकळ्या जागेत लावण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र रेल्वे प्रशासनाने पालिकेला दिले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने सदर प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.