नायर दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकाला पालिकेची नोकरी द्या - राखी जाधव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायर दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकाला पालिकेची नोकरी द्या - राखी जाधव

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात राजेश मारू या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांकडून राजेश मारूच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र राजेश हा त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने त्याच्या वारसाला पालिकेची नोकरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.

नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये राजेश मारू हा तरुण खेचला जाऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रुग्नालय प्रशासनाने हलगर्जी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण, महिला कर्मचारी सुनीता सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने या तिघांना दोषी ठरवत निलंबित केले आहे. राजेश मारू याच्या परिवाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेबाबत बाबत राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दुर्घटना घडल्यानंतर विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्यासह रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालय प्रशासन राजेशची चुकी असल्याचे सांगत आहे. राजेशने एमआरआय रूममध्ये जायला नको होते असे सांगितले जात आहे. एमआरआय रुमला दोन दरवाजे आहेत. एमआरआय रूमच्या बाहेर अटेंडंट का नव्हता असा प्रश्न राखी जाधव यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर वॉर्डबॉयने आणायला पाहिजे होते. मात्र असे न होता रुग्णाच्या नातेवाईकाला सिलेंडर आणायला सांगितले गेले. रुग्णालयातून सांगितल्यानेच राजेशला ऑक्सीजन सिलेंडर आणावे लागले. याचा अर्थ पालिकेच्या रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांकडून सर्व कामे करून घेतली जात आहेत हे स्पष्ट होत असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद आहेत. इमारजन्सीमध्ये एखाद्या रुग्णाचा एमआरआय करावयाचा असल्यास त्या रुग्णांना त्रास सहन करावा लागणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप राखी जाधव यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एमआरआय सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मशीनच्या सुरक्षीततेसाठी कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्व रुग्णालयात एमआरआय व सिटी स्कॅन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घ्यावी याची मार्गदर्शक तत्वे निश्चित करून त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच राजेश मारू याच्या कुटुंबियांना महापालिकेने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages