मुंबई - मुंबई अग्निशमन दलातील जवानांच्या बदल्या राहत्या घरापासून दूरवरच्या केंद्रांमध्ये करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे जवानांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या बदल्यांबाबत चर्चा करून योग्य निर्णय होईपर्यंत या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी मुंबई महानगर कार्यालयीन कर्मचारी संघटनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात संघटनेचे सरचिटणीस ऍड. प्रकाश देवदास यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अग्निशामकांचा सर्वसाधारण पध्दतीने बदल्या केल्या जातात. मात्र प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्याने ठराविक युनियन कार्यकर्त्यांचीच बदली केली आहे. अग्निशामकांच्या बदल्या करताना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणचा विचार केलेला नाही. नालासोपारा, कांदिवली, बोरीवली येथे राहणारे अग्निशामक सध्या अंधेरी येथे तर बदलापूर येथे राहणारे मरोळ कार्यरत आहेत .मात्र कांदिवली, बोरिवली येथे राहणाऱयांची मांडवी, देवनार तर नालासोपारा,बदलापूर येथे राहणाऱ्या अग्निशामकांची इंदिरा डॉक, रावळी कॅम्प, चिंचोली येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे. संघटनेचा बदलीसाठी विरोध नाही. परंतु त्यांच्या राहत्या ठिकाणचा विचार करून बदल्या केल्या पाहिजे. त्यामुळे याबाबत चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत अग्निशामकांच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.