![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/36533451_486019805145472_1170464891232845824_n.jpg?_nc_cat=0&oh=72d559062c768489f6fc42362923245f&oe=5BE37CB7)
मुंबई - अंधेरी येथे सकाळी पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानंतर काही वेळातच वाकोळा येथे बसचा अपघात झाला. मात्र यात कोणीही जखमी झालेले नाही. पुलाच्या दुर्घ़टनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाने ज्यादा बसगाड्यांची सोय केली होती. अंधेरीहुन शहराकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अंधेरीहुन बेस्टने ज्यादा बस सोडल्या होत्या . अंधेरी आगरकर चौक ते सिप्झ दरम्यान मजास आगार तर्फे ४१५ क्रमांकांची दुमजली बस चालवली जाते , प्रवाशांची शहर विभागाकडे जाणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्टने या दुमजली बस शहराकडे वळवल्या. त्यानुसार सकाळी १० च्या सुमारास दुमजली बस क्र ३९ ही अंधेरीहुन कला नगर वांद्रे साठी सोडण्यात आली. ही बस १० .४० वाजता पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला रिलायन्स एनर्जी येथे आली असता येथे बांधलेल्या कमानीला धडकली . सध्या वाकोला येथे कुलाबा - बांद्रा - सिप्झ दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचे काम सुरु आहे. त्यानुसार तेथून जाणारी वाहतूक ही सांताक्रूझ उड्डाण पुलाखालून जाते. त्यामुऴे जास्त उंची असलेल्या वाहनांना तेथून प्रवेश नसल्याने ती कमान बांधण्यात आली होती. बसचालकाला त्याचा अंदाज न आल्याने बस कमानीला आदळल्याने या बसचा अपघात झाला. यांत कोणीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.