![](https://www.hindustantimes.com/rf/image_size_960x540/HT/p2/2018/04/19/Pictures/_ab749468-4338-11e8-9c90-d40a08109dff.jpg)
मुंबई 10/7/2018 - मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत होत असून आगी लागण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. असे असतानाही मुंबई अग्निशमन दलात १२२७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून त्यामुळे वित्तहानी आणि जीवितहानी वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करून अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली आहे . .
मुंबईमध्ये एकूण २३ अग्निशमन केंद्रे असून एकूण ४२०१ पदे आहेत. यामध्ये २९७४ पदे भरलेली आहेत तर १२२७ पदे रिक्त आहेत . यामध्ये महत्वाची अशी वरिष्ठ केंद्र अधिकारी ४० , सहाय्यक केंद्र अधिकारी ८१ , दुय्यम अधिकारी ६५ यंत्रचालक १८० प्रमुख अग्निशामक १९६ व अग्निशामक ५०६ या पदांचा समावेश आहे . मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटीहून अधिक असून यामध्ये गगनचुंबी इमारती जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, दैनंदिन निर्माण होणाऱ्या दुर्घटना, मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या आगीच्या घटना, झाडे पडण्याच्या घटना, तसेच नैसर्गिक आपत्ती या सर्व संकटांचा सामना २३ अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना करावा लागतो. तर अपुऱ्या कर्मचार्यांमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडतो, आणि त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यासाठी पालिका आयुक्तांनी अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत निर्णय घ्यावा असेही लांडे यांनी म्हटले आहे.