अहमदाबाद - शेतकरी कर्जमाफी, पाटीदार आरक्षण आणि राजद्रोह प्रकरणी अटक असलेल्या अल्पेश कथिरिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी २५ ऑगस्टपासून आपल्या घरी आमरण उपोषण करत असलेले पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी उपोषणाच्या आठव्या दिवशी शनिवारी पाणी पिणे सुरू केले आहे. हार्दिक यांनी दोन दिवसांपूर्वी पाण्याचा त्याग केला होता.
हार्दिक यांची प्रकृती बिघडत असल्याने स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख एस. पी. स्वामी यांनी शुक्रवारी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला होता. त्या वेळी हार्दिक यांच्या डोळ्यात पाणी आले होते आणि त्यावर विचार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागितला होता. हार्दिक यांनी शनिवारी त्यांच्या हाताने पाणी प्यायले. हार्दिक यांनी पाणी पिण्याचा आग्रह मान्य केला, पण शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत अन्नग्रहण करणार नसल्याचे स्वामी म्हणाले. पाणी प्यायल्याने त्यांना दिलासा मिळेल, पण उपोषण सुरू असल्याने अधिक सुधारणा होणार नाही. त्यांच्या रक्तातील ॲसिटोनची मात्रा वाढल्याने किडनी आणि इतर अवयव प्रभावित होत आहेत, अशी माहिती हार्दिकची तपासणी करत असलेले डॉ. अभयराजसिंह यांनी सांगितले. उमिया माता संस्थेच्या पदधिकाऱ्यांनी हार्दिक यांची भेट घेतली.
दरम्यान मेधा पाटकर या शेतकरी विरोधक असल्याने उपोषणाला बसलेले पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी पाटकर यांना परत पाठवून दिले. २५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेल यांना भेटण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर तेथे पोहोचल्या, मात्र पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी (पास) त्यांना पटेल यांना भेटू दिले नाही.