कुत्रा चावल्याने ६ वर्षांत ३५ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुत्रा चावल्याने ६ वर्षांत ३५ जणांचा मृत्यू

Share This

मुंबई - मुंबईतील पालिका रुग्णालयांत श्वानदंशाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, मागील ६ वर्षांत रुग्णालयांत उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी ३५ जणांचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात केईएम रुग्णालयात २२ तर नायरमध्ये १३ जणांना उपचारादरम्यान जीव गमवावा लागला आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यामुळे कुत्रा चावण्याच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. २०१२ मध्ये पालिका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ११ हजार ९७३ मुंबईकरांना कुत्रा चावल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले. २०१७ मध्ये १७ हजार ३६० मुंबईकरांनी कुत्रा चावल्याने पालिका रुग्णालयांत उपचार घेतले. यातील ३५ जणांचा उपचार सुरू असताना रेबीजमुळे मृत्यू झाला. २०१२-१८ या वर्षांत केईएम रुग्णालयांत ९ हजार ८३१ जणांना कुत्रा चावल्याची नोंद करण्यात आली होती. यात एप्रिल २०१८ या चालू वर्षात ५९२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर नायर रुग्णालयात मागील ६ वर्षांत ९ हजार ३४५ जण उपचारासाठी आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१५-१७ या वर्षात पालिका दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या ६४ हजार ९३४ मुंबईकरांना कुत्रा चावल्याची माहिती समोर आली होती. यात शहरांतील ११ हजार ४६२ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता, तर पश्चिम उपनगरात ३१ हजार २९३ लोकांना आणि पूर्व उपनगरातील २२ हजार १७९ जणांना कुत्रा चावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages