विरोधकांनी 'मारक शक्ती'चा वापर केल्याने भाजपा नेत्यांचे मृत्यू - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विरोधकांनी 'मारक शक्ती'चा वापर केल्याने भाजपा नेत्यांचे मृत्यू - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

Share This
भोपाळ - भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाबद्दल साध्वी प्रज्ञा सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विरोधकांनी भाजपविरोधात 'मारक शक्ती'चा वापर केल्यामुळं हे घडत असल्याचा संशय साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात बेलगाम वक्तव्यांमुळं वादात अडकलेल्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.साध्वींच्या या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळं विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. 

भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली व बाबूलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत साध्वी यांनी हे तर्कट मांडले. 'लोकसभा निवडणूक लढत असताना मला एक महाराज भेटले होते. ते म्हणाले होते खूप वाईट काळ सुरू आहे. अशा वेळी साधनेत खंड पडू देऊ नका. साधनेचा वेळ वाढवा. विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करतोय. भाजपचं नुकसान व्हावं म्हणून हे सगळं सुरू आहे. तुम्ही टार्गेटवर आहात. काळजी घ्या. हे होणार आहे,' असं महाराज म्हणाले होते. 'तेव्हा मी महाराजांनी सांगितलेलं सगळं विसरून गेले होते. मात्र, भाजपचे मोठे नेते एका मागोमाग एक आम्हाला सोडून जात असताना मला त्यांचे बोल आठवताहेत. ते खरंतर बोलत नव्हते ना, असं वाटू लागलंय,' असं साध्वी म्हणाल्या. भाजपचे सर्वोच्च नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर गेल्या वर्षभरात भाजपच्या अनेक नेत्यांचं निधन झालं. मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर व आता अरुण जेटली यांचं निधन झालं आहे. हाच धागा पकडून साध्वी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages