![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiHQyXF7VFUOyQvNVNzrtQYF4tfQqA5gh3rMmdMldoyafNHqOOuPU5smcKP3xA13tmoQboRcchixfPlPYX-1Dt6ICqfV9zNGgEZPgQurg36_1-QmBj3nIZ41gqXb97-adY9wRE-PFTD1KblcHisG7EeT3qaoYG9rRwyPS7V2LawejsAdlaZzo85DC_e/w640-h380/dead%20body.jpg)
मुंबई - कोरोना काळात फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सहा कालावधीत ० ते ५ वर्ष वयोगटातील सुमारे आठ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या लेखी उत्तरात दिली आहे. आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
बालमृत्यूचे प्रमाण औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या जिल्ह्यात जास्त झाल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. सर्वात जास्त बालमृत्यूंची नोंद शहरी भागात झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर येथे ९२३, औरंगाबाद येथे ५८७, मुंबई शहरात ७९२, पुणे शहरात ४२२ आणि नाशिक शहरात ४१७ बालमृत्यूंची नोंद झाल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी उत्तरात दिली आहे. साथ रोगाच्या काळात आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी तज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने माता आणि बाल आरोग्यासंबंधी सेवांचे बळकटीकरणासाठी केलेल्या शिफारशीनुसार आरोग्य विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करीत असताना गर्भवती माता, स्तनदा माता, कुपोषित आणि आजारी बालकांकडे दुर्लक्ष झाले नसल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
राज्य सरकार मार्फत आजारी आणि नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, नवजात शिशु कोपरा, ग्राम बाल विकास केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, जंतनाशक आणि जीवनसत्व मोहीम घरच्या घरी नवजात बालकांची काळजी जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रातील भाषांमार्फत अतिसार, न्यूमोनिया व तसेच सेप्सिस या आजारांचे व्यवस्थापन करण्यात येते अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्तरात दिली आहे.
No comments:
Post a Comment