Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महापरिनिर्वाण दिन - लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर



मुंबई - प्रज्ञासूर्य महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या क्रांतीचा मळा फुलला होता. देशाच्या कानाकोप-यातून खेड्यापाड्यातून आलेल्या छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांपर्यंत चैत्य़भूमीवर दाखल झाले होते. काही २० ते २५ वर्षापासून नित्यनेमाने येणारे अनुयायीही होते. बाबासाहेब ही आमची प्रेरणा आहे. येथे आल्यावर चैतन्य़ निर्माण होते, असे म्हणत महामानवाच्या स्मृतींना अभिवादन केले.

महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून आलेले भीम अनुयायांनी दादर रेल्वेस्टेशन ते शिवाजीपार्क- चैत्यभूमीपर्यंत अगदी शिस्तीने बाबासाहेबांना अभिवादन केले. चैत्यभूमीवरील शिस्तबध्द असलेली गर्दी समुद्रालाही लाजवेल अशीच होती. तीन दिवसांपासून थंडी वा-यातून मुक्कामास असलेल्या अनुयायांच्या चेह-यावर थकव्याचा लवलेशही नव्हता. बाबासाहेब आमची प्रेरणा, येथे आल्यावर थकवा कुठचे कुठे निघून जातो असे अनेकांकडून ऐकायला मिळत होते. काही जण नित्यनेमाने येतात. गावाकडे दुष्काळ, शेती जेमतेम तर काहींची शेतीही नाही, असे अनेकांनी चैत्यभूमीवर येण्यासाठी १५ दिवस सलग मजुरी केली, पैसे साठवले आणि चैत्यभूमीवर आल्याचे सांगितले.

बाबासाहेबांचा येथे क्रांतीचा मळा फुलतो, तो यापुढेही असाच फुलत राहिल असे भावना अनेकांनी व्यक्त केली. बीड, अमरावती, अकोल्याहून काही लेकरांसह ग्रुपने लोक आले आहेत. आम्ही मागील अनेक वर्षापासून चैत्यभूमीवर येतो. आमच्या लेकरांनाही बाबासाहेबांचे विचार समजावेत बाबासाहेब कोणत्या परिस्थितीत शिकले, त्याची प्रेरणा मिळून त्यांनीही शिकून मोठे व्हावे यासाठी त्यांनाही घेऊन येतो, असे अकोल्याहून आलेल्या काहींनी सांगितले. शेगाव व मलकापूरहून आलेल्या ७० ते ७५ वयाच्या आजीबाई या मागील २५ वर्षापासून चैत्यभूमीवर न चुकता येतात. येथे आल्यावर बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जातो. त्यांनी हा नित्यनेम कायम ठेवला असून अंगात त्राण असेपर्यंत येथे येणार. बाबासाहेबांच्या विचारांनी अंगात स्फुरण चढतं असे सांगत त्यांनी हात उंचावत जबतक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का नाम रहेगा अशा जोरदार घोषणा दिल्या.

दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मुंबई महापालिकेच्या सुविधाही पुरेसा पुरवण्यात आल्य़ाने अनेकांनी समाधान व्यक्त केले. दी बुध्दीस्ट सोसायटी आॉफ इंडियाच्या शाखांच्या स्वयंसेवकांनी व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी अनुयायांच्या रांगेविषयी शिस्तबध्दता राखली होती. मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय, फिरती शौचालये आदी पुरेसा सुविधा पुरवल्य़ाने कोणतीही अडचणी आल्याच्या तक्रारी नव्हत्या. बेस्टनेही सुविधा पुरवण्यास कुचराई केली नव्हती. चैत्य़भूमी व शिवाजीपार्क परिसरात डॅा. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौत्तम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूमहाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्यांनी सजलेल्या स्टॉलवर खरदीसाठी गर्दीच गर्दी होती. आंबेडकर, गौत्तम बुध्द यांच्या प्रतीकृती, छायाचित्र उपलब्ध करण्यात आली होती. मागील दोन - तीन दिवसांपासून येथे मुक्कामास असलेल्यांना विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार व जेवणाची व्यवस्था केली होती. अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणा-या अनुयायांना पिण्याच्य़ा पाण्याची उत्तम सोय होती. चैत्यभूमीवरील शिस्तबध्द असलेली गर्दी समुद्रालाही लाजवेल अशीच होती. मोफत नेत्र चिकित्सा शिबीर, मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संघटनांच्या माध्यमातून विविध आजारांवर माहिती देण्यासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले होते. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. राज्य सरकारच्या सार्वजनिक न्याय विभागाच्यावतीने स्टॉल उभारण्यात आला होता. विविध व्यावसायाची माहिती व कर्ज पुरवठा यासंदर्भात सखोल माहिती दिली जात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरील आधारित साहित्य खरेदीसाठी स्टॉलवर गर्दीच गर्दी होती.

बाबासाहेबांच्या विचारांच्या साहित्याचा खजीना --
डॅा. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुध्द, महात्मा फुले, शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या साहित्यांचे स्टॅाल्स सजले होते. बाबासाहेबांच्या भाषणाचे खंड, आदी दुर्मिळ पुस्तकांची खरेदी करण्यासाठी स्टॅाल्ससमोर गर्दीच गर्दी होती. अनेकजण साहित्यात भारावले होते. काही पुस्तके सवलतीच्या दरात विकली जात होती. हवे ते पुस्तक उपलब्ध असल्याने अनेकांच्या चेह-यावर समाधान होते.

चैत्य़भूमीवरून कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण -
ज्यांना चैत्यभूमीवर येणे शक्य नाही अशांसाठी चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचे तसेच विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे चैत्यभूमीवर न आलेल्यांना महामानवाला घरबसल्या अभिवादन करता आले. मुंबई महापालिकेने ही सोय केल्य़ाने अनेकांना घरबसल्याही अभिवादन करता आले. चैत्यभूमी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दादर ते चैत्यभूमी, शिवाजी पार्क पर्यंतच्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांना हटवल्याने रस्ते मोकळे होते. त्यामुळे अनुयायांना विना अडथळा शिस्तीने चैत्यभूमीपर्यंत जाता आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom