Best - बेस्टमधील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली, दंडाच्या रकमेत ८ पटीने वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2024

Best - बेस्टमधील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली, दंडाच्या रकमेत ८ पटीने वाढ


मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुध्द तसेच खरेदी केलेल्या तिकीटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरूध्द बेस्ट उपक्रमाने विशेष तिकीट तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत बेस्ट उपक्रमाने मुंबईत गर्दीच्या बसस्थानकांवर अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची नेमणुक करून २ जानेवारी २०२४ रोजी एकूण ९४५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५८ हजार ४५७ रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल केली. बेस्ट उपक्रमास विशेष तिकीट तपासणी मोहीमे पूर्वी विनातिकीट प्रवाशांकडून प्रतिदिवशी अंदाजे ७ हजार एवढा दंड प्राप्त होत होता, या प्रकारे विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविल्याने बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात दंडापोटी प्राप्त झालेल्या उत्पन्नात प्रतीदिन ८ पट पेक्षा जास्तीने वाढ झालेली आहे.

सध्या बेस्ट उपक्रमाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेल्या प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येतो. सदर दंड भरण्याचे नाकारल्यास, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६० (ह) अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे.

वस्तुतः बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येक प्रवाशाला बंधनकारक असून, विना तिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा देखील आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये दररोज ३२ ते ३५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. बस प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजुला याच गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून उत्पन्नात घट होत असल्याचे बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आले. यास्तव बेस्ट उपक्रमाने २०२४ वर्षाच्या सुरवातीपासून विशेष तिकीट तपासणी मोहिम राबविलेली असून याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची मुंबईच्या विविध भागातील गर्दीच्या ठिकाणातील बसस्थानकांवर नेमणुक केलेली आहे.

या अंतर्गत बेस्ट उपक्रमातर्फे विशेष पथके तयार करण्यात आली असून या पथकामध्ये एकूण ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणी करिता मुंबईच्या वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. या मोहिमेत २ जानेवारी २०२४ रोजी तब्बल ९४५ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून एका दिवसात याद्वारे ५८ हजार ४५७ रूपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे असे आवाहन करण्यात येते की, सर्व बस प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट अथवा वैध बसपास घेऊन, तिकीट व बसपासवर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad