जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झालाय, पोलिस महासंचालकांची कबुली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झालाय, पोलिस महासंचालकांची कबुली

Share This

मुंबई - एकीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचे महायुती सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली स्वत: पोलिस महासंचालकांनी दिली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी आहे असे रश्मी शुक्ला यांनी पत्रात म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलिस दारावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.

कोण आहेत रश्मी शुक्ला - 
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिका-यांपैकी एक, आहेत. सशस्त्र सीमा बलचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages