भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. पिसे बंधा-याच्या गेटमधील रबरी ब्लाडर मधून दिनांक १६ मार्च २०२४ रोजी अचानक बिघाड झाला. त्यातून पाणी गळती झाली. बंधा-यातील पाणीपातळी ३१ मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
भातसा धरणातून पिसे बंधा-यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्यामुळे पिसे बंधा-यातील पाणी पातळी वाढण्यास कालावधी लागणार आहे. बंधा-याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्हणजेच मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीच्या म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. याची दखल घेऊन नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment