पावसाचा कहर - रस्त्यांवर पाणी, रेल्वे वाहतूक विस्कळीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाचा कहर - रस्त्यांवर पाणी, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Share This


मुंबई - नवी मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात ब-याच भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नवी मुंबई, ठाण्यापासून ते कोकणापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नद्या, ओढे, नाल्यांना पूर आल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

शहापूरमधील गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामध्ये भारंगी नदीचे पाणी घुसल्याने पाच ते सहा फोर व्हीलर आणि वीस ते पंचवीस टू व्हीलर या वाहून गेल्या आहेत. त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलर चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांमध्ये साधारण तीन फुटापर्यंत भारंगी नदीच्या पुराचे पाणी गेले आहे. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले.

पावसाचा परिणाम कोकण रेल्वेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात जाणा-या सर्व गाड्या रखडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस रखडली आहे. आटगाव वाशिंद दरम्यान ट्रॅकवर झाड पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे खडवली स्टेशन दरम्यान रेल्वेट्रॅकवरील खडी व माती वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. कसा-यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणा-या अप साईडच्या गाड्या पूर्णपणे विस्कळीत असून स्थानकादरम्यान अनेक एक्सप्रेस व ट्रेन एकामागे एक उभ्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या वसई दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले. पनवेल आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात पाणी घुसले आहे. गाड्या पाण्यात अर्ध्या डुबल्या आहेत. सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. कमरेपर्यंत पाणी साचले आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages