
मुंबई - महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमधून आता तब्बल 30 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. महायुती सरकारने बनावट बहिणींवर सुमारे 3000 कोटी रुपये वाया घालवले, असा दावा केला जात आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 18 ते 61 वयामधील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत सरकारने सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे सात हप्ते मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात येत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यात 25 हजारांहून अधिक लाभार्थी महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 30 लाख अपात्र महिलांची ओळख पटली आहे. या महिलांना आठव्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, असा दावा महिला व बालकल्याणमधील सूत्रांनी केला आहे.
तक्रारी प्राप्त झाल्या अशा अर्जांची पडताळणी -
वेगवेगळ्या माध्यमातून काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशा अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही पडताळणी सरसकट केली जाणार नाही.
- आदिती तटकरे
महिला व बालकल्याण मंत्री
No comments:
Post a Comment