
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम वाढवली आहे. सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे कर्ज देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी 4% या अतिशय परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या योजनांपैकी एक आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना अर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे लागते. मात्र योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा नाही. पूर्वी किसान क्रेडिट कार्डव 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी हमी आवश्यक होती. अलिकडेच, रिझर्व्ह बँकेने (RBI) हमीमुक्त कर्जाची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजे, आता दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय घेता येणार आहे.
किसान क्रेडीट कार्ड योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यावेळी अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो देखील द्यावे लागतात. त्याचबरोबर ओळखपत्र देणे देखील आवश्यक आहे. यामध्ये अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, मतदार कार्ड आणि पासपोर्ट द्यावे लागते. त्याचबरोबर राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड द्यावे लागते. महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित जमिनीचे प्रमाणपत्र, क्रॉपिंग पॅटर्न सांगावा लागतो.
ज्या बँकेतून किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे. पर्यायांच्या यादीतून किसान क्रेडिट कार्ड पर्याय निवडा. अप्लाय वर क्लिक केल्यावर अॅप्लिकेशन पेज उघडेल. तुमच्या आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा आणि तो सबमिट करा. आता तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर बँक तुमच्याशी ३-४ कामकाजाच्या दिवसांत संपर्क साधेल.
No comments:
Post a Comment