
मुंबई - राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ केल्यानंतर मीटर रिकॅलिब्रेशनसाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. यानंतरही १० हजारांहून अधिक टॅक्सी आणि ५० हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलिब्रेशनकडे पाठ फिरवली आहे. हे टॅक्सी-रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडेवसूल करत असून प्रवाशांची लूट सुरू आहे.
राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सींच्या भाडेदरात तीन रुपयांची वाढ केली. सुधारित दराने भाडे घेण्यासाठी रिक्षा, टॅक्सींना रिकॅलिब्रेशन करण्यास ९० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात आली. अनेक रिक्षा- टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन शिल्लक राहिल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या नंतरही शहर व उपनगरांतील हजारो टॅक्सी आणि रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन अपूर्ण आहे.
ताडदेव, वडाळा, अंधेरी व बोरिवली येथील आरटीओ कार्यालयांकडील नोंदीनुसार १०,३६४ टॅक्सी आणि ५०,९१४ रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन अद्याप झालेले नाही. रिक्षा-टॅक्सीचालक मीटर रिकॅलिब्रेशनकडे दुर्लक्ष करत मनमानी भाडेवसुली करत आहेत. याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रिक्षा-टॅक्सीचालक प्रवाशांना जुमानत नाहीत. परिवहन विभागाने दिलेली ३१ मेची 'डेडलाईन' संपण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने या कालावधीत उर्वरीत रिक्षा-टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे.
मीटर रिकॅलिब्रेशन बाकी (२८ मे २०२५ पर्यंतची आकडेवारी)
अंधेरी
रिक्षा - १८,१११
टॅक्सी - ८५७
बोरिवली
रिक्षा - १३,४६६
टॅक्सी - १६४२
वडाळा
रिक्षा - १९,३३७
टॅक्सी - २९६५
ताडदेव
टॅक्सी - ४९००
No comments:
Post a Comment