
मुंबई - राज्यभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरु असतानाच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुंबई शहर-उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबनाथ, बदलापूर, वाशी, पनवेल, वसई विरार, पालघर या भागातही पावसाचा जोर आहे. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन मंदावली. तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. विक्रोळी येथे भूस्खलन झाल्याने 2 जणांचा मृत्यू झाला.
शनिवारी सकाळपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याच वेळी, नाशिक, पुणे, सातारा आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आवाहन केले आहे की लोकांनी फक्त महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडावे. पोलिसांनी सांगितले की अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी झाली आहे, म्हणून विनाकारण प्रवास करू नका.
गरज नसल्यास घराबाहेर पडू नका -
आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळा, कुठलीही आवश्यकता भासली, तर मदत आणि अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत, मुंबई पोलिसांच्या 100/112/103 वर किंवा मुंबई पालिकेच्या 1916 वर कॉल करू शकतात.

No comments:
Post a Comment