
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणे तुडुंब भरल्याने पुढील वर्षभरासाठी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईकरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे पूर्ण भरली असल्याने मुंबईकरांनी पाण्याची चिंता करू नये असेही माळवदे म्हणाले.
यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. सप्टेंबर या पाचव्या महिन्यातही पाऊस चांगला पडत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडूंब भरली आहेत. मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार तलाव, पवई तलाव, तुळशी तलाव, भातसा तलाव या सात प्रमुख धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ही सातही धरणे आता ९९ टक्के क्षमतेने भरली असल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.
मुंबईकरांना दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणी लागते. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात आणखी धरण बांधले जाणार आहे. मुंबईत सध्या २२ हजारांपेक्षा अधिक जलजोडण्या करण्यात आल्या आहेत. पाण्याची जी चोरी होत होती. ती कमी झाली आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, जमिनीखाली गळती शोधून दुरुस्त करणे मोठे आव्हानात्मक काम असते. पालिका प्रशासन तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी गळती थांबवत असल्याचे माळवदे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment