
मुंबई - रिझर्व्ह बँकेने ५ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे तर मुंबईतील एक आणि अहमदाबादमधील एका बँकेवरही कारवाई केली.
रिझर्व्ह बँकेने द जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लिमिटेड, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या तीन जिल्हा बँकांवर कारवाई केली. या बँकांना आर्थिक दंड करण्यात आला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १५ सप्टेंबरच्या आदेशानुसार ३.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यामध्ये नो यूवर कस्टमर संदर्भातील नियम आणि मार्गदर्शक सूचनांची पूर्तता न केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही १५ सप्टेंबरच्या आदेशानुसार साडेचार लाखांचा दंड ठोठावला. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १९५६ च्या बँकिंग नियमन कायद्याच्या सेक्शन २० आणि सेक्शन ५६ संदर्भातील तरतुदींचे पालन न झाल्याने १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मुंबईतील भारत को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई लिमिटेडला सायबर सुरक्षेसंदर्भातील कारणासाठी ३.७५ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. राष्ट्रीयीकृत, खासगी, सरकारी, अर्बन बँकांकडून बँकिंग रेग्युलेशन कायदा आणि बँकिंग संदर्भातील इतर नियमांचं पालन केले जात की नाही यावर आरबीआयकडून नियंत्रण ठेवले जाते. ज्या बँका किंवा वित्तीय संस्था नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर आरबीआयकडून कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन ज्या प्रमाणात असेल त्यानुसार आरबीआयकडून केले जाते. आरबीआयकडून बँकांना आर्थिक दंड आकारला जातो तर काही वेळा बँकांवर कठोर कारवाई केली जाते.

No comments:
Post a Comment