
पुणे - रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २ लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत, यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे ख-या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ््यांप्रमाणेच त्यांनी गनिमीकाव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सारथी, महाज्योतीप्रमाणे योजना राबविल्या जाणार
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला २ लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज, तर उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पोलिस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.


No comments:
Post a Comment