
मुंबई - मुंबई उपनगरीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी व सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. दररोज लाखो प्रवासी – नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी – लोकलने प्रवास करतात. अशा मोठ्या प्रमाणातील प्रवासात सुरक्षेचे प्रश्न सतत निर्माण होत असून, विशेषत: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व डब्यांमध्ये अनिवार्य सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी ठोस मागणी मराठी एकीकरण समितीने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
समितीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पाश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणाऱ्या छेडछाडीच्या, चोरीच्या आणि धक्काबुक्कीच्या घटना वाढल्या आहेत. अनेकदा अशा घटनांचे पुरावे नसल्याने आरोपी सुटून जातात. त्यामुळे लोकलमधील मेन, लेडीज, दिव्यांग, सीएसटी, फर्स्ट क्लास अशा सर्वच डब्यांत सीसीटीव्ही बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे समितीचे मत आहे.
निवेदनात पुढील मुद्दे विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहेत -
1. गुन्हेगारांचा अटकण्याचा वेग वाढेल.
2. महिलांच्या सुरक्षेत मोठी वाढ होईल.
3. खिसेकापू, मारझोड, चोरी, मारामारी यांसारख्या घटनांवर नियंत्रण येईल.
4. रेल्वे प्रशासनालाही घटनांचे तपशील स्पष्टपणे पाहता येतील.
समितीने म्हटले आहे की, प्रवाशांच्या तक्रारी, अपघात, चोरी, छेडछाड अशा सर्व घटना लक्षात घेता लोकलमधील सीसीटीव्ही ही काळाची गरज आहे. सीसीटीव्हीमुळे पुरावे उपलब्ध झाल्यास आरोपींवर त्वरित कारवाई करता येईल आणि प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास आणखी दृढ होईल.
या निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, लवकरात लवकर निर्णय घेऊन मुंबई उपनगरीय लोकलच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment